Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 जागांपैकी भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनल 12 जागांवर विजयी तर काँग्रेस (खा. बाळू धानोरकर गट) समर्थित शेतकरी सहकार पॅनलने 6 जागांवर विजय मिळवला. हा निकाल म्हणजे खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीचा मोठा विजय मानला जात आहे.


आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया आणि संजय डोंगरे यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपा समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलने मोठा विजय प्राप्त केला आहे. 18 जागांपैकी भाजपा समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलने 17 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलने एका जागेवर विजय मिळवला आहे.


राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवाल. आज (ता. २९ एप्रिल) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडलेल्या मतमोजणीत १८ पैकी १४ जागांवर काँग्रेस भाजप युतीने स्पष्ट बहुमत मिळवत शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. तब्बल वीस वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस-भाजप युतीला दणदणीत विजय मिळवता आला. एकूण १८ जागांपैकी काँग्रेस-भाजप युतीने १४ जागा प्राप्त केल्या. एक अपक्ष, तर शेतकरी संघटनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. पहिल्यांदाच आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी एकत्र येऊन शेतकरी संघटनेचा गेम केला.


खासदार बाळू धानोरकर यांचे कॉंग्रेसचा पराभव करीत, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे अध्यक्ष संतोष रावत यांचे कॉंग्रेसनी मूलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत घवघवीत विजय मिळविला. दिनांक 29 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या कृउबासच्या निवडणूकीचा निकाल आज तहसिल कार्यालयात जाहीर करण्यात आला. संतोष रावत यांनी मूल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला.


ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज दि. 29 एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजप प्रणित पॅनेलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षांपासून काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. त्यामुळे यावर्षी देखील आपली सत्ता कायम राखणे हे काॅंग्रेससाठी प्रतिष्ठेचे होते.


२९ एप्रिल २०२३ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात कोरपना तालुक्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसनी विजय मिळवला. कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे १३, शेतकरी संघटना ४ गोंडवाना १ तर भाजपाला ० जागा मिळाल्या.


दि. २९ एप्रिल आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपा समर्थित श्री गुरुदेव शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळविला असून बाजार समितीवरील सत्ता अबाधित राहिली आहे. 

 सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले. १८ सदस्यसंख्या असलेल्या सिंदेवाही बाजार समितीवर यापूर्वी भाजपा प्रणित पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळी या विभागाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि निवडणुकीत रंग भरला. तेवढीच प्रतिष्ठा भाजपा कडून जोपासण्याचे प्रयत्न करण्यात आले. यात सहकार क्षेत्रातील ११ जागेपैकी ६ जागा, ग्राम पंचायत गटातील ४ पैकी ३ जागा , आणि व्यापारी गटातील २ पैकी दोन्ही जागा अशा एकूण ११ जागा जिंकत काँग्रेस प्रणित पॅनलने कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला कब्जा मिळविला आहे. याउलट सत्ताधारी भाजपा प्रणित पॅनलला केवळ ७ जागेवर समाधान मानावे लागले. 


वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शुक्रवारी मतदान होऊन आज निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूकीत विद्यमान खासदार, आमदार यांच्या शेतकरी विकास पॅनलला धक्का देत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनलने १८ पैकी ९ जागांवर आघाडी घेत विजय मिळविला. शेतकरी विकास पॅनलनी १८ पैकी केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली भाजप, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी एकत्र येत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनल उभी केली होती. या पॅनलने ९ जागा मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता कायम राखली जावी यासाठी खासदार, आमदार महोदयांनी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना केवळ ८जागाच मिळविता आल्या. आघाडी गटाच्या पॅनल १८ पैकी ९ जागांवर विजय मिळवून सत्तेच्या जवळ पोहचले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने