चंद्रपूर जिल्ह्यात शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या; मुलगा गंभीर #chandrapur #chimur #murder

Bhairav Diwase
1 minute read
चिमूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर आंबोली येथील एका इसमाने ४८ वर्षे महिलेचा काठीने मारहाण करून खून केला असून मुलाला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली. शारदा दयाराम वाघ असे मृतक महिलेचे नाव आहे तर मोहन दयाराम वाघ असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे.

आंबोली येथील आबादी प्लॉट बसस्थानक परिसरात राहत असलेली विधवा महिला शारदा दयाराम वाघ, मुलगा मोहन हे दोघेही आपल्या घरी झोपडी उभारण्यासाठी खड्डे खोदत असताना बाजस राहत असलेले गोपीचंद संपत शिवरकर (३०) या आरोपीने लपत छपत येऊन शारदा दयाराम वाघ हिच्या डोक्यावर बैलबंडीला लावण्यात येणाऱ्या उभारीने वार केला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलगा धावला असता, त्यालाही जखमी केले. मुलाने त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला. घराच्या जागेचा व शौचालयाच्या सांडपाण्यामुळे आरोपीचा व शारदा वाघ यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वाद होता. त्यांच्यात नेहमीच भांडण होत होते. शुक्रवारी झोपडी उभारण्याचे निमित्त झाले अन् आरोपीने शारदा दयाराम वाघ यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास शंकरपूर पोलिस करीत आहेत.