औरगांबाद येथे एका मोठ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून लागला. त्याच्या हाताखाली 30 ते 40 इंजिनीअर होते.
Bhairav Diwase. June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोनानं देशात थैमान घातलं आहे. लॉकडाऊनमुळे तर अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं आहे. मात्र, अशा परिस्थितीत चंद्रपूर शहरातील एक मॅकॅनिकल इंजिनीअर इतरांसाठी रोल मॉडल ठरला आहे. पलाश जैन असं या इंजिनीअरचं नाव आहे.
चंद्रपुरातील तुकूम परिसरातील पलाश जैन यानं नाशिक विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो औरगांबाद येथे एका मोठ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून लागला. त्याच्या हाताखाली 30 ते 40 इंजिनीअर होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, हा आनंद जेमतेम आठ महिनेच पुरला. कारण जगासोबत देशातही कोरोनाचा शिरकाव झाला होता.
त्यामुळे बंदी लागण्यापूर्वीच कंपनीतील 300 जणांना काढण्याची तयारी सुरू होती. यात पलाशही होता.
पलाशने मात्र त्यापूर्वीचे राजीनामा देत आपले घर गाठलं. तब्बल दोन महिने तो घरीच बसून होता. काही दिवस तोही नैराश्यात होता. परंतु लवकरच पलाशने स्वत:ला सावरले. कोरोनामुळे अनेक जणांनी रोजगार गमावल्याने त्यांनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तुकुम येथील एसटी वर्कशॉप समोर अशा अनेकांनी आपले दुकाने मांडले. हे सर्व पलाश बघत होता, त्यांना बघून त्यालाही नवी दिशा मिळाली. दिवसभर हे विक्रेते येथे राबत असत मात्र त्यांच्या खाण्याची कुठलीही सुविधा नव्हती. कारण सर्व उपहारगृह आणि नाश्त्याचे दुकान बंद. ही संधी पलाशने हेरली आणि त्याने घरी बनवलेली इडली पार्सल विकणे सुरू केले. ते ही अवघ्या 20 रुपयांत पाच.
नाशिक, पूणे, औरंगाबाद भागात तो वास्तव्याला होता. सकाळी गर्दीच्या ठिकाणी जावून नाश्ता विकणाऱ्यांची पद्धत तिकडे रूढ आहे. हीच पद्धत त्याने चंद्रपुरात सुरू केली. सुरवातीचे चार दिवस प्रतिसाद न मिळाल्याने केलेल्या इडल्या कुटुंबीयांनाच खाव्या लागल्या. मात्र त्याने हार मानली नाही. पहाटे तीन वाजता उठून इडली तयार करायची आणि सकाळी सहा वाजता भावासोबत ग्राहकांच्या शोधात निघायचे. हीच त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. त्याला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छतेकडे त्याचे कटाक्षाने लक्ष असते. आता तो रूग्णालय, छोटे व्यावसायिक यांना इडली विकत आहे. कुटुंबाला काही हातभार लागावा, यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. यात तो 'खूश' नाही मात्र 'समाधानी' आहे.
कोरोनाने आपल्याला जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. नोकरी गमावलेल्या अभियंता पलाशची ही सुरुवात छोटी वाटत असली तरी भावी उद्योजकाची बीजे याच कृतीत दडली असतात अशा दाखले आपल्या इतिहासात अनेक आहेत. त्यामुळे पलाशची ही भरारी नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागणार आहे. बड्या कंपन्यांत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्यांना कधी आपल्यावर बेरोजगारीची पाळी येणार हे स्वप्नातही वाटलं नसेल.यातील अनेकांना नैराश्याने ग्रासले. यामुळे काहींनी मृत्यूला देखील कवटाळले. पण काहींनी हे नैराश्य झटकून नव्या उमेदीने नव्या जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. पलाशची जिद्द परिस्थितीसमोर हताश झालेल्या हजारो युवकांना नवी उमेद देणारी ठरणार आहे.