कृषी विभागाच्या वतीने ०१ ते ०७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताह.
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यामंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्याने कृषी विभागाच्या वतीने कृषिदिन व कृषि संजीवनी सप्ताहाचे जिल्हा नियोजन भवन येथे उद्घाटन पार पडले.
यावेळी, उपस्थित अधिकार्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या हंगामापूर्व कृषी संबंधी माहिती सादर केली. तसेच जिल्ह्यातील पारंपरिक शेतीला बगल देत नावीन्यपूर्ण शेती करणार्या आदर्श शेतकऱ्यांचे याठिकाणी सत्कार करण्यात आले. यावेळेस काही शेतकरी बांधवांनी आपले मनोगतही व्यक्त केले. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकर्यांनी नवतंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्रासंबंधी नवनविन योजनांनी कृषी अधिकाऱ्यांकडून नेहमी माहिती घेत रहावी. तसेच शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न असोत त्यांना प्राथमिकता देऊन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिकार्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासोबतच एक अपग्रेड शेतकरी म्हणून सतत आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन शेती केल्यास आपण उत्तम शेती कनिष्ठ नौकरी या गतकाळातील लोकम्हणीला सत्यात उतरवू शकतो. असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना, जिल्ह्यात मामा तलावाची कामे, मागील शासनाच्या यशस्वी जलयुक्त शिवाराअंतर्गत केलेली कामे इ. यांमुळेही कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला असे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी मंचावर, खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती वडखेलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. पाटील, डॉ. नागदेवते, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांसह जिल्ह्यातील अनेक कृतिशील शेतकरी बांधव उपस्थित होते.