अपघात होण्याची शक्यता?; प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-
राजुरा:-दोन महिन्या पासून दडी मारलेल्या पावसाने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावली आणि विरूर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी रस्त्याचे अंतरंग उघडे पडले आहे. पावसाआधी प्रशासनाने रस्त्याची आधीच दुरुस्ती करायला पाहिजे होती पण तसे न करता फक्त बघ्याची भूमिका पार पाडली आहे. परंतु रिमझिम पाऊस येताच शहरातील विविध भागांतील डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अपघाताला बळी पडून स्वर्गाचा दरबारात हजेरी लागल्याने त्यास जबाबदार कोण असा प्रश्न विरूर स्टेशन आणि तेथील आजूबाजूच्या पाच सहा गावांतील रहिवासीयांना पडला आहे. रिमझिम पावसात ही स्थिती निर्माण झाली आहे तर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास काय होईल याची चिंता देखील येथील वाहनधारकांना व नागरिकांना पडली आहे.
विरूर गावातील परिसरात अवघ्या दोन आठवड्यात ठराविक अंतराने पावसाने हजेरी लावली, त्यामुळे रस्त्याची दैनावस्था निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासनाने नेहमी निर्माण होणारे संकट लक्षात घेऊन मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली अनेक रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात का होईना डागडुजी करायला पाहिजे होती, पण त्या कडे सर्रास दूर्लक्ष केले. उन्हाळ्यात शहरात विकास कामाच्या नावाखाली अनेक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते पण खोदकाम झाल्यावर त्याचे मजबुती करन करणे गरजेचे होते पण तसे काही झाले नाही, परिणामी अनेक भाग रिमझिम पावसाने चिखलमय झाले आहेत.
वरूर पासून ते विरूर स्टेशन या मार्गाने जात असतांना या मुख्य मार्गावर जलतरण झाल्याचे दिसून येतात. ठिकठिकाणी चक्क मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याची खोली इतकी आहे की रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्ता लक्षात येत नाही. या रस्त्यावरून ये-जा करताना काही वाहनधारक पडले आहेत. रस्त्याची ही अवस्था अपघातास घातक असल्याची तक्रार वाहनधारक आणि तेथील नागरिक करत आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात खड्यामुळे अपघात होऊन काही वाहनधारकांचा जीव गेला. यंदाही तसा काही प्रकार घडतो की काय अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे डबक्यात पाणी साचून राहते त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना खड्डयामुळे बऱ्याचदा अपघात संभावतो. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविल्याने अनेकांना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे ही अतिशय वाईट बाब आहे.