विचोडा (बु.) या गावात गेटेड बंधाऱ्याचे लोकार्पण संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- विचोडा (बु.) या गावात एका कार्यक्रमासाठी मी आलो असता नागरिकांनी बंधारा बांधण्याबाबत मागणी केली होती. मी नागरिकांना शब्द दिला होता. आज हा शब्द पूर्ण होवून या बंधा-याचे लोकार्पण करताना मला जो आनंद होत आहे तो अवर्णनीय आहे. आजवर नागरिकांना विकासाबाबत मी जी जी आश्वासने दिली ती प्राधान्याने पूर्ण केली आहे. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मंजूर सदर बंधा-याच्या माध्यमातुन नाल्यामध्ये पाणी साठल्याने दोन्ही बाजूच्या काठावर 500 मीटर पर्यंत असलेल्या शेतक-यांच्या शेतामधील विहीरी व बोअरींगमध्ये निश्चीतपणे जलस्तर वाढणार असून शेतक-यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात सिंचनाच्या अनेक योजना या जिल्हयात मी पूर्णत्वास आणल्या. विधानसभेतील स्थानापेक्षा जनतेच्या हृदयातील स्थान आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्यातील विचोडा (बु.) या गावात चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मंजूर 1 कोटी 12 लक्ष रू. किंमतीच्या गेटेड बंधा-याच्या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या सभापती सौ. नितू चौधरी, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, पंचायत समितीच्या सभापती सौ. केमा रायपूरे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत सोयाम, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहूले, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, सरपंच सौ. किरण डोंगरे, अनिल डोंगरे, प्रकाश बोबडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, अर्थमंत्री असताना चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्हयातील सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला चिचडोह प्रकल्प आम्ही पूर्ण केला, पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आणली, शिवणी (चोर) उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला, चिचाळा व दिघोरी या परिसरातील गावांसाठी बंद पाईपलाईनच्या माध्यमातुन सिंचन सुविधा उपलब्ध करण्याचा यशस्वी प्रयोग आम्ही केला. मागेल त्याला शेततळे, विहीरी आम्ही उपलब्ध करून दिल्या. टाटा ट्रस्टच्या माध्यमातुन 90 गावे दत्तक घेतली. महानिर्मीती कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर या भागात विकासकामे पूर्णत्वास आणली.
वनमंत्री पदाच्या कार्यकाळात श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातुन बफर झोन क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासासाठी 25 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्र मागे पडली असताना कृषि क्षेत्राची मात्र लक्षणीय प्रगती झाली. याच भागातील छोटा नागपूर गावातील स्मशानभूमीच्या जागेसाठी सरपंचांनी मागणी केली असता आम्ही त्यासाठीही मदत केली. विचोडा (बु) या गावाशी माझे नाते गेले 25 वर्षापासून आहे. किती कोटी किंमतीच्या विकासकामाचे लोकार्पण हा माझ्यादृष्टीने महत्वाचा भाग नसून या गावातील नागरिकांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी आलो आहे. गावात कोणतेही संकट असेल त्या काळात मदतीचा हात देणारा कार्यकर्ता हा भाजपाचाच असेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कोरोना काळात आशा वर्कर भगिनींनी आपला जीव धोक्यात घालुन जनतेची सेवा केली. ख-या अर्थाने या भगिनी कोविड योध्दया आहेत. त्यांचा सत्कार करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे आ. मुनगंटीवार या वेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डोंगरे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. आ. मुनगंटीवार यांच्याकडे विकासासंबंधी आजवर जी मागणी आम्ही केली ती त्यांनी प्राधान्याने पूर्ण केली. नागरिकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांबाबत सदैव जागरूक व सजग असलेला हा लोकप्रतिनिधी आमचा नेता आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक वर्षापासून या गावात नाल्यावर बंधारा बांधण्याची मागणी प्रलंबित होती. आम्ही ही मागणी सुधीरभाऊंसमोर ठेवली आणि ती प्राधान्याने पूर्ण झाली यासाठी आम्ही त्यांचे आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही अनिल डोंगरे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नामदेव डाहूले, सौ. नितू चौधरी आदींची भाषणे झालीत.
कोविड काळात सक्रीयरित्या कार्यरत असलेल्या आशा वर्कर भगिनींचा यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सींग पाळून गामस्थांची उपस्थिती होती.