पोंभुर्णाः- उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा महाराष्ट्र मध्ये सुरू असून महिलांचे स्वयंसहाय्यता समूह तयार करून दशसूत्रीच्या माध्यमातून समूहातील प्रत्येक महिलेचा व त्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात कार्यरत आहे. सदर अभियान पोंभुर्णा तालुक्यात कार्यरत असून मागील 4 वर्षांपासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे.
उमेद अभियान राज्य कक्षाकडून दरवर्षी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार 2020-21 ही योजना उत्कृष्ट स्वयं सहाय्यता समूहासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येते. व विभागनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक देऊन गौरविण्यात येते. सदर स्पर्धा ही तालुकास्तरीय नंतर जिल्हास्तरीय व तिथे उत्कृष्ट ठरलेला समूह हा विभागस्तरीय निवडीसाठी पाठविण्यात येते. त्यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक साई स्वयंसहाय्यता समूह, घाटकूळ तालुका पोंभुर्णा याची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात आली. त्यानंतर विभागस्तरीय समिती मार्फत साई समूहाची मुलाखत घेऊन विभागस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याचे निवड समितीमार्फत कळविण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक म्हणून 20 हजार रोख रक्कम व विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक म्हणून 15 हजार रुपये असे एकूण 35 हजार रुपये व श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार सरस महोत्सव मध्ये समूहाला दिले जाते.
साई स्वयंसहाय्यता समूहाची निवड झाली ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण समूहांनी केलेल्या कामाची (दशसूत्रीच्या माध्यमातून) ती पावती आहे. तसेच सलग दोन वर्षे तालुक्यातील समूहाची निवड विभागीस्तरावर होत आहे. हे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालयातील कर्मचारी तसेच वेळोवेळी सर्व पंचायत समिती मधील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे होत आहे. असे मत श्री. राजेश एम. दुधे तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद यांनी व्यक्त केले .