(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- लोकसेवा मंडळ नावाची संस्था स्थापन करुन स्व. नीळकंठ राव गुंडावार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनिय असून या संस्थेतर्फे चालू असलेले कार्य हे ख-या अर्थाने लोकसेवा आहे, असे प्रशंसोद् गार आ.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
ते येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक स्व. नीळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या ११३ व्या जयंती समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आपल्याच देशात आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत.त्यामुळे इतर देशांच्या लोकांकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी व जिद्दीने अभ्यास करावा.असा उपदेशही मुनगंटीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केला. तसेच 'जागतिक परिप्रेक्षात भारतासमोरील आव्हाने व संधी' या विषयावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, भारत हा सुदृढ विद्यार्थ्यांमुळे जगातील देशांचा कप्तान होऊ शकतो.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे विदर्भ प्रांत महामंत्री गोविंद शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, दत्तप्रसाद महादाणी, लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, प्राचार्य पी.आर.बतकी, पर्यवेक्षक बी.एम.दरेकर, जयंती समारोह प्रभारी प्रा. सचिन सरपटवार प्रभृती मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती, स्व. नीळकंठराव गुंडावार आणि स्व. जगन्नाथ गावंडे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे वृक्ष आणि ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते गोविंद शेंडे यांचा शाल,श्रीफळ,वृक्ष आणि ग्रामगीता भेट देऊन चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सिद्धी मिलिंद गंपावार या विद्यार्थिनीने डी.फार्म.मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिच्या वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी 'राम मंदिर ते राष्ट्र मंदिर' या विषयावर गोविंद शेंडे यांनी गुंफलेल्या पहिल्या पुष्पातून भारताला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन केले.तसेच काश्मिरमधील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येणे हे अयोग्य असल्याचे म्हटले.राम मंदिर विश्वाची ताकद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी, स्व.नीळकंठराव गुंडावार यांच्या जिवनावर आधारीत गौरव गीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बतकी यांनी केले.संचालन उपप्राचार्य सुरेश परसावार यांनी केले.तर आभार पर्यवेक्षक दरेकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.