आ. मुनगंटीवार यांच्या सारखा कर्तबगार भाऊ पाठीशी असणे हे महिलांचे भाग्य - सौ. उमा खापरे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
आज स्त्रीयांनी सर्वच आघाडयांवर स्वतःला सिध्द केले आहे. तेजस्वीनी म्हणुन सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्त्रीयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने बचतगटांची चळवळ रुढ झाली. भारतीय जनता पार्टीने महिला मोर्चाच्या माध्यमातुन स्त्रीयांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पुढाकार घेतला. तळागाळातील शेवटच्या व्यक्तीच्या चेह-यावर आनंद निर्माण व्हावा यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सातत्याने प्रयत्नरत असतात व सदैव राहतील असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री व विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. २६ जानेवारी रोजी गोंडपिपरी येथे मकर संक्रांती उत्सव तसेच जागर स्त्री शक्तीचा या महिला सम्मेलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. उमा खापरे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, जि.प. सदस्या सौ. वैष्णवी बोडलावार, सौ. स्वाती वडपल्लीवार, कल्पना अवथरे, भूमी पिपरे, कुसुम ढुमने, बबन निकोडे ,निलेश संगमवार, चेतनसिंह गौर, राकेश पुन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना गोंडपिपरीच्या विकासासाठी २० कोटी रु. निधी उपलब्ध करुन दिला. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करत अनेक विकासकामे पुर्णत्वास आणली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनकल्याणासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा या संतवाणीनुसार आता जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची कार्यकर्ता ओळखावा, नेता तेथेची जाणावा असे स्वरुप संघटनेत येणे अपेक्षित आहे, असे सांगत जनसेवेचे व्रत असेच सुरु ठेवा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयातील भगींनींच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा भाऊ भक्कमपणे पाठीशी उभा असल्याने त्यांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ. उमा खापरे यांनी केले. सदैव लोकहितासाठी संघर्ष करणारा हा भाऊ सोबत आहे या अर्थाने या जिल्हयातील महिला भाग्यवान आहेत. त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. स्त्री शक्तीचा हा जागर निश्चितच महिला विकासाच्या दृष्टीने पुरक ठरेल अशी अपेक्षा सौ. उमा खापरे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, सौ. वनिता कानडे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणा जांभुळकर यांनी केले तर संचालन दमयंती वाकडे, मनिषा मडावी, श्रीमती दिवसे यांनी केले. आभार प्रदर्शन अश्विनी तोडासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. राखी रासमलवार, सौ. प्रियंका रासमलवार, सौ. अल्का फलके, सौ. किरण नगारे, सौ. माया वाघाडे, सौ. प्रांजली बोनगिरवार, सौ. अस्मिता राफलवार, सौ. कविता नागापुरे, सौ. सरिता पुनेकर, सौ. अनुजा बोनगिरवार, कु. अंजली खंडरे, सौ. धीरा गौर, कु. सुषमा तोडासे आदिंनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.