Top News

दारुबंदी उठविण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर आलाच नाही!

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट.
Bhairav Diwase.    Dec 02, 2021

चंद्रपुर:- जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्या संदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळापुढे आलाच नसल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिल्याने आता काँग्रेसचे नेते व जिल्हाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठविण्या संदर्भात केलेल्या घोषणेचे काय होते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ना. जयंत पाटील 28 जानेवारीपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिमूर येथे दिलेल्या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान पत्रकारांनी जिल्हातील दारूबंदी उठणार की नाही? असा प्रश्न विचारला असता त्यांनी चंद्रपूरच्या दारुबंदी उठविण्यासंदर्भात अजून तरी कॅबिनेटपुढे प्रस्तावच आला नसल्याचे सांगून तूर्तास दारुबंदी उठविण्याचा निर्णयांवर प्रश्नचिन्ह टाकले आहे.

चंद्रपुर येथील दारूबंदी उठविण्यासाठी शासनाने एका उच्चस्तरीय समितीचे गठन केले आहे. मात्र त्या संदर्भात आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचे ना. पाटील म्हणाले. यासंबंधी समिती राज्य उत्पादन शुल्क खात्याने स्थानिक पातळीवर व जिल्हा पातळीवर नेमली असेल तर ते मला ठाऊक नाही परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळापुढे यासंदर्भात प्रस्ताव मांडलेला नाही, त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडी सरकारचा दारूबंदी उठविण्यासंदर्भात तसा कुठलाही धोरणात्मक निर्णय नाही. असेही ना. जयंत पाटील म्हणाले. 

     चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी एकीकडे कंबर कसली आहे. येत्या 1 एप्रिल पासून चंद्रपूरची दारूबंदी हटवेल असा दावाही वडेट्टीवार करीत आहेत. त्यासाठीच अलीकडेच म्हणजे 13 जानेवारीला राज्य शासनाच्या गृहविभागाने एक अधिसूचना काढून दारूबंदी समीक्षा समितीचे गठन केले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी चक्क चंद्रपूरच्या दारूबंदी हटविण्यासंदर्भातील प्रस्तावच कॅबिनेट मंत्रीमंडळपुढे आला नसल्याने त्यावर बोलून काही उपयोग नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
      
   आता चंद्रपूरच्या दारुबंदी संदर्भात वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा खरी ठरते की जयंत पाटलांनी केले वक्तव्य वरचढ ठरते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील मागील फडणवीस सरकरच्या कार्यकाळात 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपुर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यात मात्र अवैध दारूविक्री सुरू झाली व गल्लोगल्ली दारू पुरवठा होऊ लागला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने