कोरपना:- कोरपना तालुक्यातील खिर्डी येथील कृष्णदेव रामदास पिपरे यांच्या दोन बैलाने शेतातील विषारी औषध पिल्याने दोन्ही बैलांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १२ ला) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, धामणगाव शिवेतील उमाकांत सेलोकर यांच्या शेतात पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी औषधाचे द्रावण करून ठेवले होते. हे द्रावण दोन्ही बैलांनी पिल्यामुळे बैलांचा मृत्यू झाल्याचा आरोप बैल जोडी मालक कृष्णदेव पिपरे यांनी केला आहे. बैलांच्या मृत्यूमुळे ऐन संकटाच्या काळात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याचा दावा पिपरे यांनी केला आहे. शासनाकडून मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान याच शेतात 11 एप्रिलला धामणगाव येथील देवराव कातले ज्यांच्या जनावराला विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने शेती मालक उमाकांत सेलोकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बैलजोडी मालक कृष्णदेव पिपरे यांनी केली आहे.
त्या शेतकऱ्यावर कारवाई करावी........
शेतामध्ये विषारी द्रव्य ठेवणे किंवा विद्युत करंट लावून ठेवणे हे मुक्या जनावरांसाठी घातक असून कोणतेही जनावर केव्हाही शेतामध्ये येऊ शकते. त्यामुळे मुक्या जनावरांना मारण्यासाठी अशी पद्धत अवलंबणे मुक्या जनावरांसह शेतकऱ्यांसाठी सुद्धा घातक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अमानवी कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कृष्णदेव पिपरे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा