Top News

नक्षल्यांनी केली मामाची गोळ्या झाडून हत्या.


पोलिसांनी पार पडला भाचीचा विवाह सोहळा.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
एटापल्ली:- लग्न सोहळा म्हटला की 'मामा'ला खूप महत्व असते. अनेकदा मामाच्या प्रतीक्षेत लग्नाला उशिरही होते. मामा नसेल, तर लग्न मंडपाची शान नसते. अशाच एका मामाअभावी पोरकी झालेल्या एका गरीब मुलीच्या विवाहासाठी पोलिस दल पुढे सरसावले आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्या युवतीचा विवाह पार पडला.

हेही वाचा:- लग्न समारंभात घुसून नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या.

गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत नक्षल्यांनी केवळ संशयावरुन अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी गावचे माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षल्यांनी ३ एप्रिलच्या रात्री गावातील एका लग्न समारंभात डीजे लावत असताना गोळ्या घालून हत्या केली.
त्यानंतर रामा तलांडी यांची भाची सपना मंथनवार हिचे लग्न जुळले. घरची परिस्थिती हलाखीची आणि वेळोवळी मदतीला धावून येणारा मामाही नाही. अशावेळी लग्न करायचे तरी कसे, या विवंचनेत सपनाची आई होती. आईने बुर्गी येथील पोलिस मदत केंद्र गाठले. पोलिस अधिकाऱ्यांना परिस्थिती सांगितली. लागलीच सपनाच्या विवाहाच्या खर्चाचा भार उचलण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठरविले.
२२ जून २०२१ रोजी सपनाच्या विवाहाची तारीख ठरली. पोलिस उपनिरीक्षक सर्वश्री अलुरे, श्री.बुरकुल, श्री.शिंदे आणि त्यांच्या सहकारी जवानांनी सपनाला किराणा साहित्य, संसारोपयोगी भांडी व अन्य साहित्य दिले. यामुळे तिचा विवाह आनंदात पार पडला. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी सपनाचे मामा रामा तलांडी यांच्या हत्येचा निषेध करीत पोलिस दल संकटाच्या वेळी मदतीला धावून येत असल्याची भावना व्यक्त केली. सपनाच्या कुटुंबीयांनीही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने