Top News

30 सप्टेंबरपुर्वी प्रवेश प्रक्रिया पुर्ण करा. #UGC


1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरू; UGC चे महाविद्यालयांना निर्देश.
नवी दिल्ली:- विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केलं जाईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. #UGC
शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या 31 ऑगस्टपूर्वी घेणं आवश्यक असून त्या ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत. इंटरमिडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे आधीच्या सेमिस्टरच्या आधारे करण्यात यावं, त्या संबंधी 2020 साली दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावं असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.
बारावीचा निकाल 31 जुलै रोजी लागणार आहे. या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात. जर काही कारणामुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबला तर महाविद्यालये 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करु शकतात असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.
देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षांवर झाल्याचं दिसून आलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया कशा पार पाडायच्या यावर खलबतं झाली. शेवटी त्या-त्या राज्यांतील सरकारांनी यावर तोडगा काढला. महाराष्ट्रात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने