Top News

"आमची युती खा. राणेंमुळे नव्हे, तर मुख्यमंत्री उद्धवजींच्या सल्लागारांमुळे तुटली..... #BJP #Shivsena

चंद्रपूर:- खरे पाहिले तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची २५ वर्षांची मैत्री ही खा. राणेंमुळे तुटली, असे म्हणणे योग्य होणार नाही. २४ ऑक्टोबर २०१९ ला आमच्या मैत्रीने महायुतीची निवडणूक लढविली आणि १६१ जागा जिंकल्या. महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजपला निवडून दिले. ही युती खा. नारायण राणे यांच्यामुळे नाही तुटली, तर मुख्यमंत्री उद्धवजींचे जे सल्लागार आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजींमध्ये बेईमानी करण्याची भावना निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर हे परिणाम झाले, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. #BJP #Shivsena
विचारांची लढाई आमच्यामध्ये नव्हती. आमच्यामध्ये एकच भावना होती, ती म्हणजे देशभक्तीची. पण काही सल्लागारांनी मुख्यमंत्री उद्धवजींना सत्य, देशभक्ती यांपेक्षा मुख्यमंत्र्याची खुर्ची महत्वाची आहे, हे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते सल्लागार यशस्वी झाले आणि दुर्दैवाने शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे प्रेम होतं, त्यात दुरावा निर्माण झाला. आता हा दुरावा कमी होण्याची सुतराम शक्यता सध्यातरी दिसत नाहीये, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. आता त्यांचे सल्लागार कोण, हे वेगळे सांगणे न लगे, असे म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. #Adharnewsnetwork 
नारायण राणे यांच्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे संबंध दुरावले, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपुरात प्रतिक्रिया दिली. राणेंमुळे युती तुटली हे योग्य नसल्याचे विधान त्यांनी ठामपणे केले. महायुतीला १६१ जागा मिळाल्या आणि नंतर मुख्यमंत्री उद्धवजीच्या सल्लागारांनी त्याच्यात बेईमानीची भावना निर्माण केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काही सल्लागारांनी सत्य - देशभक्ती ऐवजी खुर्चीचा मोह मुख्यमंत्री उद्धवजींच्या मनात निर्माण केल्यामुळेच हे संबंध दुरावत गेले आणि आता पूर्णपणे तुटले, असेही मुनगंटीवार म्हणाले.
 मागील काळामध्ये शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होती की काय, असे चित्र निर्माण झाले होते. तशी विधाने भाजप आणि सेनेच्या नेत्यांकडून माध्यमांमध्ये येऊ लागली होती. आ. मुनगंटीवारही एकदा म्हणाले होते की, शिवसेना आमचा शत्रू नाहीये. कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत मेसेज पोहोचवण्यात काही लोक यशस्वी झाल्याचे दिसत होते. पण खा. नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या ‘त्या’ विधानाने महाराष्ट्राचे राजकारणच पलटून गेले. महाराष्ट्रभर येवढा मोठा राडा झाल्यानंतर नजीकच्या काळात तरी शिवसेना आणि भाजप एकमेकांजवळ येतील, असे वाटत नाही.  #साभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने