Top News

नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंका. #Mumbai


भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला राजकिय प्रस्ताव.
मुंबई:- संवेदनाहीन, निष्क्रिय आणि स्वतःच्याच शपथनाम्याशी अप्रामाणिक असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने वैभवशाली महाराष्ट्राची माती केली. त्यामुळे या सरकारविरोधात रणशिंग फुंका असे आवाहन लोकलेखा समितीचे अध्यक्ष, भापजचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.


मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणी बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्यांच्या खास उत्स्फूर्त शैलीत हा प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, महाराष्ट्र २६/११ रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला जसा विसरू शकत नाही त्याचप्रमाणे २८/११ रोजी लोकशाहीचा झालेला खूनही विसरलेला नाही. बेइमानीच्या आधारावर राज्यात तीन चाकी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार आणि कायदा सुव्यवस्था या सर्वच आघाड्यांवर या सरकारची भुमिका नाकर्तेपणाची राहिली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, शेतकरी, एसटी कामगार आत्महत्या करीत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत, पण सरकार सतत दुर्लक्षच करीत आहे.

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मते मागणारा पक्ष आज जातीयवादी शक्तींसोबत सत्तेची खुर्ची वाटत आहे. महाराष्ट्रात हे राजकीय कौरव अराजकता निर्माण करीत आहेत. याना पराभूत करण्यासाठी शंखनाद करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात न येता राज्य कारभार चालू शकतो, हे तर आश्चर्यकारक आहे असे ते म्हणाले.  कॅबिनेटमधील मंत्री अधिकारी, महिलांना लक्ष्य करीत आहेत. अशांना नंबर वनचे मुख्यमंत्री ठरविण्यात आल्याचे नवल वाटते, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची सरकार पॅकेजच्या माध्यमातून फसवणूक करतेय. त्यांची थट्टाच पॅकेजने केली आहे. कोविडमुळे संपूर्ण राज्य ठप्प झाले होते. अशातही शेतकरी राबत होता. मात्र हाच शेतकरी अतिवृष्टी आणि पुरामुळे अडचणीत असताना सरकारने त्यांच्याकडे पाठ फिरवली. भाजपने जेव्हा याबाबत आक्रमक भूमिका घेतली तेव्हा २५ हजारांचे वचन १० हजारांवर आल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केली. वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. धानाचा बोनस मिळालेला नाही. सरकार कष्टकऱ्यांना नाही, दलालांना पैसे देत आहे. अशी तिजोरी अरबी समुद्रात बुडवून टाका, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्टेडियमला नाव दिले म्हणून टीका करतात. पण अजित पवार अर्थसंकल्पात शरद पवार ग्राम समृद्धी योजना जाहीर करतात ते चालते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दोन खासदार निवडून आणणारे महाराष्ट्रातील काही पक्षाचे नेते पंतप्रधान पदाचे स्वप्त पहात आहेत. भाजपने असे स्वप्न कधीच पाहिले नाही. भाजप मातृभूमीची सेवा करून मोठा झालेला पक्ष असल्याचे, आ. मुनगंटीवार म्हणाले. मंत्रालय जेनतेची सेवा करणारे सेवाकेंद्र आहे, तिथे दारूच्या बाटल्या सापडत असल्याबद्दल त्यांची संताप व्यक्त केला. २०० कोटींचे संरक्षण असलेल्या मंत्रालयात हा प्रकार आढळतोच कसा असा सवालही त्यांनी केला.  
महाविकास आघाडीने असा महाराष्ट्र घडविला त्याच्या माजी गृहमंत्र्यासह अनेक मंत्री जेलमध्ये आहेत. माजी पोलिस आयुक्त फरार आहे. अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतले आहेत. दंगलींची मालिका घडत आहे, मात्र मंत्री, नेते पैसे खाण्यात गुंतले आहेत. कुख्यात गुंड जेलमधुन सुटल्यानंतर त्यांची शोभायात्रा महाराष्ट्रात निघत आहेत. अनैतिक पक्षांचे सरकार असलेल्या राज्यातच हे घडू शकते अशी टीका आ. मुनगंटीवार यांनी केला. केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु राज्य सरकार त्याला नकार देत आहे. केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्या राज्य सरकारने व्हॅट कमी करायला हवा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी आकडेवारीसह केली.
मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ भागवत कराड, डॉ भारती पवार, विनय सहस्त्रबुद्धे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार यांच्यासह केंद्रिय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महामंत्री, राज्य कार्यकारिणी सदस्य ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने