पुरात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या #Gadchiroli #suicide

Bhairav Diwase

गडचिरोली:- सततच्या पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने रविवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडू नामदेव चौधरी (वय ४९, रा. मुडझा, ता. गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौधरी यांची ४ एकर शेती आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी मुसळधार पावसामुळे सतत पूर आल्याने त्यांच्या शेतातील धानपीक चार वेळा पुराच्या पाण्यात बुडाले. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान कसे भरुन काढायचे, या विवंचनेने त्यांना ग्रासले होते
. अखेर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतातील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. बंडू चौधरी यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहेत.