पोरगा पोहायला गेला, खोल पाण्याचा अंदाज चुकला, आयुष्याला मुकला! #Chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मावळत्या वर्षाला निरोप तसेच रविवारी सुटी असल्याने पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर शहरातील एका १५ वर्षीय मुलाचा बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती - कढोली पुलाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली. जीत रवींद्र गाऊत्रे (१५, रा. नगिनाबाग, चंद्रपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

रविवारी सकाळी ११:०० वाजता जीत आपल्या तीन मित्रांसह वर्धा नदीच्या हडस्ती - कढोली पुलाजवळ पोहण्यासाठी गेला होता. तिघेही पोहत असताना जीत खोल पाण्यात गेला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. जवळील मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात धाव घेतली. मात्र, तो दिसला नाही. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. आपत्कालीन विभाग तसेच स्थानिक मच्छिमार महादेव मेश्राम व संबा मेश्राम या बंधूंच्या सहकार्याने त्याला शोधण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेहच पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. यावेळी बल्लारपूरचे प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी महादेव कन्नाके आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)