Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! #Ramteke #loksabha #Ramtekeloksabha

रश्मी बर्वेंचं सकाळी जातप्रमाणपत्र रद्द, संध्याकाळी उमेदवारी अर्ज बाद
नागपूर:- काँग्रेसच्या रामटेकच्या (Ramtek Lok Sabha Election) उमेदवार रश्मी बर्वेंचा (Rashmi Barve) उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरूवारी सकाळी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं. तर संध्याकाळी अर्ज बाद करण्यात आला आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे यांनी यावेळी डमी अर्ज भरल्याने आता तेच रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.


जात प्रमाणपत्र वैध नसल्याचं कारण देत निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. मात्र रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज ग्राह्य धरलाय.


महायुतीकडून जात प्रमाणपत्रावर आक्षेप

या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी पार पडली. त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला.

रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र तयार करताना खोटी कागदपत्रं जोडली, त्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कसे खोटे आहे हे महायुतीच्या नेत्यांनी वकिलामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पटवून दिलं. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज टिकतो की बाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं

महायुतीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अर्जाची छानणी करण्यात आली आणि त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं. त्यानंतर आता त्यांची उमेदवारीही रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

रश्मी बर्वेंच्या पतीचा अर्ज वैध

रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वेंचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता तेच काँग्रेसचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने