काँग्रेसचा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघांवर दावा #chandrapur #chandrapurcongress

Bhairav Diwase

महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता?
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण आहे. या सहाही जागा काँग्रेसनेच लढविल्या पाहिजे, असा अहवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. आमदार धोटे यांच्या दाव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या मजबूत स्थितीचा अहवाल सादर केला. 

जिल्हात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सहाही जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते तर सध्यास्थितीत जिल्हात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून या सहाही ठिकाणी काँग्रेस पक्ष खूप जास्त मजबूत असल्याने या सहाही विधानसभा काँग्रेसनेच लढवाव्यात अशी भक्कम भुमिका मांडली. यावर मंथन होऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या भुमिकेला हिरवा झेंडा दाखविला आहे.

 सध्या तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित झाले असून जिल्हातील या सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी केले आहे.