Narendra Modi Wardha Speech: बारशाला गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची थट्टाच:- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Bhairav Diwase
0
वर्धा:- २०१४ पूर्वी देशात अनेक सिंचन प्रकल्प अडकून पडले. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या प्रकल्पांना आम्ही निधी दिला. त्यामुळे त्यांना पुनरुज्जीवन मिळाले. 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला,' अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. काँग्रेसने अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची केली होती, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोडले.


वर्धा व अमरावती मतदारसंघासाठी प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वर्धाचे भाजप उमेदवार रामदास तडस, अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आदी उपस्थित होते.


मोदी म्हणाले, ज्यांची काँग्रेसच्या काळात विचारपूसही केली नव्हती त्याच गोरगरीब, शेतकरी, मजुराला या गरिबाच्या सुपुत्राला साक्षात पुजले आहे. या वर्गाचा विकास हाच आमच्या केंद्रस्थानी आहे. दहा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढण्याची किमया आम्ही करून दाखविली.


पाइपलाइनद्वारे गॅस किचनपर्यंत

प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांना वयानुसार विविध आजारांना सामाेरे जावे लागते. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतची काळजी म्हणून ७० वर्षांवरील ज्येष्ठांना पाच लाखांपर्यंत आरोग्य मोफत उपचार मिळेल, तसेच प्रत्येक घरातील किचनपर्यंत पाइपलाइनने गॅस पाेहोचविला जाईल, अशी ग्वाही मोदींनी दिली.

तडस-राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊस

महाराष्ट्र आणि देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून विदर्भातील वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मतदान करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी विदर्भात प्रचार सभेसाठी आले आहेत. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोदींची वर्ध्यात सभा होत असून नेहमीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील भूमीतून मराठीत भाषणाला सुरुवात केली.भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या आणि विदर्भातील संतांचे गुणगान गायले. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे मोदींनी म्हटले. आपलं प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहेत. या सभेसाठी लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून मी भारावल्याचे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सभेत पुन्हा एकदा मराठी म्हणीचा वापर करुन विरोधकांना टोला लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)