कोरपना:- माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आज, १३ जून रोजी, सहावा दिवस आहे. दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू यांनी ८ जूनपासून हे आंदोलन सुरू केले आहे.
बच्चूभाऊंची तब्येत खालावली, राज्यभर तीव्र पडसाद
सहा दिवस उलटूनही राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने बच्चूभाऊ कडू यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत.
गडचांदूर येथे 'शोले' आंदोलन!
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी 'शोले' आंदोलन केले. 'शोले' स्टाईलमध्ये आंदोलन करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलकांनी यावेळी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. जर सरकारने तातडीने बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि त्यांच्या तब्येतीला काही झाल्यास, यापुढे महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बच्चूभाऊंच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.