Crime News: शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

Bhairav Diwase


कोरपना:- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार (११ जून ) रोजी सकाळी सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील शेतजमिनीच्या वादातून पुंडलिक कारेकर (वय ५५) रा. कोरपना यांच्यावर धारदार शस्त्राने व काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवार, १२ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात कारेकर यांचे दोन पुत्र जगदीश आणि किशोर कारेकर हे देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सुरवातील भारतीय न्याय सहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(२), ११८(२), १९१(२), १९०, १८९(२), १८९(१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, पुंडलिक कारेकर यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींवर IPC कलम १०३ (खून) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, तसेच बबन गारघाटे, विजय मसे, अरविंद मसे आणि राजेश नवले या पाच जणांना कोरपना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी या सर्व आरोपींना कोरपना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्वच आरोपींची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.