चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे, आज सकाळी ७ वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणाचे एकूण सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये, तीन दरवाजे १ मीटरने तर चार दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आलेले आहेत. यामुळे, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे इरई नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीच्या जवळपासच्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

