या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी ही चर्चा निर्णायक ठरणार असून, निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल याबाबत सकारात्मक आश्वासन प्राप्त झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगाम २०२४-२५ करिता शासनाच्या ४३ धान खरेदी केंद्रावर ५१४५ शेतकऱ्यांकडून २,०९,७४४.६२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना धानाच्या चुका-याची रक्कम रु. २७,५२,६०,३८९ /- शासनाकडून प्रदान करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू असून खते, बी बियाणे, कामगाराच्या मजुरीची रक्कम इतर साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना रकमेची नितांत गरज आहे. धानाचे चुकारे मिळाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोयीचे होईल. मात्र, अद्यापही चुकारे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्याची रक्कम त्वरित प्रदान करण्याबाबत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत पत्राद्वारे मागणी केली होती. मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेत वित्त विभागाचे सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांना निधी वितरणाचे आदेश दिले. यावेळी सदर विषयाबाबत आज मंत्रालयात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली असून याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वस्त केले.