वैनगंगेच्या घाटावरुन रोजच होतेय अवैध रेती तस्करी.

Bhairav Diwase
2 minute read
रेती तस्करांना अभय कुणाचे?
Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्व शासकीय यंत्रणा याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी रस्त्यावर उतरली आहे. मात्र, सावली तालुक्यात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध रेतीची सर्रास वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
     यातून शासनाला लाखोचा चुना लागत असल्याने,महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सावली तालुक्याला लागून असलेल्या वैनगंगा नदीच्या घाटावर अवैध रेती वाहतुकीला उधाण आले असून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर च्या माध्यमातून शेकडो ट्रॅक्टर ब्रासरेती चोरी केल्या जात आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे याला प्रशासनाने वेळीच आळा घालावा व रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.
     पत्रकार वृत संकलनसाठी गेले असता रेती तस्करांकडून पत्रकारांवर हल्ले केले जातात.  रात्रभर ट्रैक्टर नियमित चालत असल्यामुळे परिसरातील लोकांची झोप उडाली आहे. रेती तस्करांनी हजारो ब्रास रेती गावालगत साठवन करून ठेवले असल्याची चर्चा आहे. याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर भर दिवसा हल्ला केला जातो. या तस्करांना अभय कुणाचे? या विषयाची चर्चा गावात होताना दिसते, तर महसूल विभागाचे काही अधिकारी रेती तस्कराना आर्थिक लाभापोटी सहकार्य करीत असल्याची गुप्त चर्चा रेती तस्करात होत आहे.
      तालुक्यात व शहरात सामान्य माणसाला घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. पण येथे रेती तस्कर मात्र रात्रो बेरात्रो खुलेआम फिरताना दिसतात. यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील साखरी सिर्शी हरंबा डोनाला, चार्गाव  सामदा, सोनापुर पथरी चाखविरखल, दांगाव येथील राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने किंवा अधिकारी यांच्या सहकार्याने चालू आहे त्या सर्व ट्रॅक्टर रेती चोरांवर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही.
   
       सावली तालुक्यात तहसीलदार कुमरे मैडम यांनी बाहेरून आलेल्या विलगिकरण केलेल्या मजुरांना भेटण्यास गेले असता तिनशे ब्रास रेती साठवून ठेवले असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर याची पुरेपूर माहिती घेतली गेली नाही. व अजून पर्यंत काय करवही झाली हे मात्र गुलदस्त्यतच आहे. अनेक घाटावर चोर मार्ग रेती तस्करांनी तयार केलेले आहे पत्रकारावर हल्ले करण्या इतपत आणि राजेरोसपणे व बिनधास्त रेती तस्करी करीत असल्याने यांना पाठबळ कुणाचे? हा सवाल सर्वांच्या मनात घर करून आहे.