Top News

मतदार बनतोय स्वाभिमानी, उमेदवाराने वाटलेले पैसे करतोय परत.

"पैसे नको आम्हाला विकास हवाय" म्हणत मजुरी करणाऱ्या गरीब मतदारांनी पैसे केले परत.
Bhairav Diwase. March 25, 2021
परभणी:- ग्रामगीता प्रबोधनकार श्री सोपान नारायणमहाराज नागरगोजे यांनी मोलमजुरी करून जगणाऱ्या गरीब मतदारांचा स्वाभिमान जागृत केला. राणीसावरगाव ग्रामपंचायतची निवडणूक होऊन जवळपास कालावधी उलटून गेला आहे तरीही ग्रामपंचायतला विकासाची दिशा मिळत नाही. वार्डातील सदस्य लोकांच्या समस्या जाणून घ्यायला तयार नाहीत. सध्या कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी यांची कारकीर्द गावाला विकासाऐवजी भकासकडे घेऊन जाणारी आहे हे माहीत असूनही पाठीशी घातले जात आहे. या सर्व बाबीला कंटाळून निवडणुकीच्या काळात वाटलेले पैसे राणीसावरगाव, भोईगल्लीतील मतदारांनी परत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण ठरले आहे. राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी वार्ड क्रमांक 5 भोई गल्ली तील श्री विठ्ठल केरबा निलेवाड, संभाजी पिराजी निलेवाड व बालाजी नारायण बटलवार यांनी एकूण रुपये चारशे परत केले आहेत. सर्वजण अत्यंत गरीब व मजुरी करत असल्यामुळे पूर्ण रक्कम परत करू शकले नाहीत. जे काही पैसे परत केले आहेत त्यातून प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत करणारी घटना आहे. या तीनही व्यक्तींना ज्या ज्या उमेदवारांनी पैसे दिले होते त्यांनी ही रक्कम फूल नाही फुलाची पाकळी म्हणून परत घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. राणीसावरगावला जर भ्रष्टाचार मुक्त करून विकासाभिमुख बनवायचे असेल तर स्वाभिमानी व स्वकष्टाला महत्त्व देणाऱ्या लाचार न राहू इच्छिणार्‍या मतदारांनी जेवढी शक्य असेल तेवढी रक्कम परत करावी आणि महाराष्ट्रास तथा देशाला दाखवून द्यावे की आम्ही लाचार नसून सदाचारी आहोत. आम्हाला गावचा विकास हवा आहे भकास नाही. गावचे अधिकारी आणि पदाधिकारी गावचे सेवक आहेत मालक नाहीत. गावकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मनमानीपणे कोणतेही कामे करू नयेत. निकृष्ट दर्जाची कामे करून विकासाचे सोंगढोंग करू नये. जर पैसे परत करून जनता स्वाभिमानी बनत असेल तर पैसे परत घेऊन उमेदवारांनी / सदस्यांनी विकास करण्याचा प्रामाणिकपणा सिद्ध करावा. मतदार पैसे घेतात म्हणून आम्ही पैसे वाटतो हा तर्क खरा नसून सत्ता, प्रतिष्ठा व भ्रष्टाचारासाठी पैसा वाटला जातो व सामान्य जनतेला दुर्गुनि व्यसनी व लाचार बनविले जाते. प्रजेपेक्षा राजा सदाचारी असावा लागतो. म्हणजेच प्रत्येक नेतृत्व सदाचारी असावे लागते. म्हणजेच जनतेवर खापर फोडून चालत नाही. माझे आपणास आवाहन आहे की आपणास सदाचारी सद्गुणी बनायचे असेल व स्वतःला आणि लोकांना विकासाभिमुख बनवायचे असेल तर पैसे परत घ्या आणि आपण प्रामाणिक आहात हे सिद्ध करा. पैसे परत करण्याच्या घटनेतून उभा महाराष्ट्र आणि देश पाहतोय. दररोज मजुरी करणाऱ्या व्यक्ती पैसे परत करत आहेत तर मग त्यांच्यापेक्षा स्वतःला शिक्षित, श्रेष्ठ व प्रतिष्ठित समजणाऱ्यानी स्वतःला लाचार, भिकारी व आईतखाऊ का समजून घ्यायचे? स्वयंस्फूर्तपणे पैसे परत करण्याच्या या अभियानामध्ये अवश्य सामील व्हा आणि विकास खेचून घ्या. धन्यवाद! Voters have returned money back to Grampanchayat candidates who had distributed during GP election. Revolutionary step in Maharashtra
 सोपान नारायण नागरगोजे - 9881260668

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने