Top News

लॉकडाऊन लावला, पण कर्जाचे काय?

महिलांचा सवाल: खाजगी बचतगटांचे कर्ज फेडायचे कसे?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-भद्रावती तसेच तालुक्यातील नव्वद टक्के महिला खाजगी बचतगटांच्या कर्जदार आहेत. सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व काम धंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे खाजगी बचतगटांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली गेडेकर यांनी केली आहे.
मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटूंबांना सोयीचे व्हावे म्हणून खाजगी बचतगटांमार्फत महिलांना १५ ते २० हजार रूपयांपर्यंत अल्पमुदतीचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावागावात तसेच भद्रावती शहरातील प्रत्येक वॉर्डात महिलांनी खाजगी बचतगटाचे कर्ज उचललेले आहे. कोरोनाच्या आधीपर्यंत महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र कोरोना व लॉकडाऊन मुळे तालुक्यातील नागरिकांना रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यातच कर्जाचे हफ्ते भरावे लागत आहेत. त्यामुळे सर्व कुटूंबच चिंतेत सापडले आहेत.
भद्रावती शहर व तालुक्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स वणी, ईसाफ फायनान्स, आरबीएल - सबके फायनान्स, ग्रामीण कोटा, ग्रामशक्ती व ईतर खाजगी कंपन्यांनी महिलांना कर्ज वाटप केलेले आहे. या खाजगी कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे प्रतिनिधी महिलांशी समजुतदारपणे वागतात. मात्र बरेच प्रतिनिधी या महामारीचा फायदा घेत महिलांना पैशासाठी धारेवर धरत आहेत. बऱ्याच महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात आहे. त्यामुळे पैशांअभावी कर्जदार महिला आत्महत्या करण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे.
लॉकडाऊनच्या आधीपर्यंत व नंतरही कर्जदार महिलांनी या खाजगी बचतगटांचे हफ्ते वेळेवर फेडलेले आहेत. मात्र मागील वर्षी पासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आता मात्र नागरिकांना चिंतेच्या विवंचनेत टाकले आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्न तालुक्यातील महिलांना भेडसावत आहे.


सरकारने लावलेल्या लॉकडाऊनला आमचे समर्थनच आहे. मात्र खाजगी बचतगटांचे महिलांचे कर्ज सरकारने सरसकट माफ करावे अन्यथा परिस्थिती ठीक होईपर्यंत कर्जाचे हफ्ते समोर ढकलण्यात यावे.
ℹ️आम्रपाली गौतम गेडेकर
सामाजिक कार्यकर्त्या, भद्रावती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने