नवी दिल्ली:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर बातमीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कोविड आणि भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे तसेच सध्याची अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई वेळ-मर्यादित पद्धतीने परिभाषित उद्दीष्ट मापदंडानुसार इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करण्यासाठी पावले उचलणार आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.