भद्रावती:- भद्रावती येथील मुख्य मार्ग तसेच शहरालगत असलेल्या महामार्गावर काही दुचाकी वाहन चालक अगदी सैराट झाले आहे. बेभान होऊन अती वेगात तसेच गरज नसताना कर्कश आवाजात हार्न वाजवीत दुचाकी चालविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या सैराट दुचाकी वाहन चालकांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा या समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री इमरान खान यांनी दिला आहे . दैनिक देशोन्नती सोबत अनौपचारीक वार्तालाप करतांना इमरान खान पुढे म्हणाले की, काही अल्पवयीन तसेच प्रौढ दुचाकी वाहन चालक आपली सामाजिक जबाबदारी विसरून शहरातील मुख्य मार्गावर तसेच शहराला लागून असलेल्या महामार्गावर फारच वेगात दुचाकी वाहने चालवितांना दिसून येते.
स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते भांदक रेल्वे स्टेशन, जि.प.हायस्कूल ते बिजासन आणि महामार्ग वरील मानोरा फाटा ते रेल्वे गेट या मार्गावर असे प्रकार सतत दिसून येतात. शहराअंतर्गत असलेल्या इतर मार्गावर सुध्दा असे उपद्रव सुरु आहे. यामुळे या मार्गावरून ये -जा करणाऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. यामुळे अपघात होत आहे. या सैराट दुचाकी चालकांना समजविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कडून असभ्य, बेजबाबदारीचे आणि उद्धट वर्तन होताना दिसून येते. पोलीस प्रशासनाने या सर्व सैराट दुचाकी वाहन चालकांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा या समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री इमरान खान यांनी दिला आहे.