Top News

चंद्रपूर मनपा पथकाच्या तपासणीत विनामास्क व्यक्तींकडून ४ हजार ५० रुपयांचा दंड वसूल #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर : कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून ४ हजार ५० रुपयाचा दंड आकारण्यात आला.
राज्य शासनाने निर्गमित केलेल्या नव्या आदेशानुसार लग्न समारंभासाठी कमाल 50 व्यक्ती, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्ती तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास कमाल 50 व्यक्तींनाच परवानगी आहे.
स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णतः बंद राहतील. हेअर कटिंग सलुन, ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेने सुरु तर रोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद आहे.
नव्या आदेशानुसार मनपाच्या पथकाने मंगळवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. आज अनेक मंगल कार्यालये बंद होती. बाजारपेठही आस्थापनात सेवा पुरवठादार मास्क परिधान केलेले आढळले. दरम्यान, विविध चौकात झालेल्या तपासणीत अनेक दुचाकीचालक विनामास्क फिरताना सापडले. अशाकडून ४ हजार ५० रुपयाचा दंड आकारण्यात आला.
नागरिकांनी बाहेर फिरताना मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने