Top News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद #Chandrapur

प्रियदर्शनी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर:- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने 31 मे 2022 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेशातील शिमला येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून पंतप्रधानांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाईल. संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरू होऊन सकाळी 10.50 वाजता समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरीत केला जाईल. संवादाच्या दुस-या भागात निवड केलेल्या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आभासी संवाद साधतील.
या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने