Top News

जिल्ह्यात जबावबंदी आदेश लागू #chandrapur



चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात विविध आंदोलन व कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या कालावधीत पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. कोणतीही व्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नितिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी तसेच लग्न समारंभ व प्रेतयात्रेकरिता लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने