वडेट्टीवारांना पक्षात किंमत नाही; १० दिवस दिल्लीत थांबूनही...; धर्मराव बाबा आत्रामांचे टीकास्त्र #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार असल्याचा दावा धर्मराव बाब आत्राम यांनी केला होता. यावर विजय वडेट्टीवार यांनीही गडचिरोलीमध्ये भाजपला लीड मिळवून दाखवा, असे थेट आव्हान आत्राम यांना दिले होते. विजय वडेट्टीवार यांच्या आव्हानानंतर आता पुन्हा एकदा बाबा आत्राम यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम?


विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या आव्हानावर पलटवार करताना धर्मराव बाबा आत्राम यांनी "त्यांना त्यांच्या पक्षामध्ये किती किंमत आहे महाराष्ट्राला माहित आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपल्या मुलीच्या तिकिटासाठी दहा दिवस दिल्लीला बसून होते. मात्र तिकीट मिळवू शकले नाही," अशी खोचक टीका केली आहे.


तसेच "गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. उसेंडी यांना तिकीट मिळण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र ते सुद्धा मिळू शकल नाही. त्यामुळे त्यांची किती किंमत आहे हे सगळ्या महाराष्ट्राला दिसून आले. त्यांच्या मुलीला तिकीट मिळाले नाही म्हणून ते नाराज आहेत. ते चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये फिरकलेसुद्धा नाहीत. मात्र माझ्यावर टीका करत आहेत," असा टोलाही आत्राम यांनी लगावला आहे.



काय म्हणाले विजय वडेट्टीवार?


दरम्यान, "भाजपमध्ये (BJP) जाण्याची चर्चा झाली असेल तर आत्राम (Dharmrao Baba Atram) यांची नार्कोटेस्ट करा. महायुतीत तुम्हाला कोणी विचारत नाही. तुमची अवस्था गुलामासारखी झाली आहे. त्यामुळे दुसऱ्यांना बदनाम करु नका," असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने