शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या; प्रहार जिल्हाध्यक्ष बिडकर यांची मागणी
चंद्रपूर:- जिल्ह्यात अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊसाचा जोर मागील काही दिवसापासून वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असल्याने जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, तळे भरगोच्छ भरून वाहत आहे. संततधार पावसामुळे सर्व जिल्हा जलमय झाला असून शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी राजा अधिक चिंता ग्रस्त झाला आहे. त्याकरिता चंद्रपूर जिल्हात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश बिडकर यांनी केली आहे.
सतत होत असलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव भरून वाहत असल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात सोयाबीन, तूर, कापूस यासारख्या पिकांची रोपटे माती सह वाहून गेली आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश बिडकर यांनी केले.