पाणी प्रश्नावरून गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
2 minute read

संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला

🟪
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसैनिक पोंभूर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करतांना आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी फेकण्यात आले.
🍰

साधारण ३० कोटी रूपये खर्च करून १५ गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रीड योजना सुरू करण्यात आली. मात्र मागील दीड महिन्यापासून वीजेचा बिल भरणा न केल्यामुळे सदर योजना बंद पडली आहे.याचाच परिणाम म्हणून ग्रीड योजनेतील १५ गावच्या लाभार्थ्यांना पावसाळ्यातही गढुळ व दुषीत पाणी प्यावे लागत आहे.याबाबत पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे समस्यांंचे अनेक निवेदने देण्यात आले होते.मात्र प्रत्येकवेळी संबंधित विभागाने‌ एकमेकांवर बाजू ढकलून देण्याचेच काम केले होते.परिणामी नागरिकांना योजना बंद असल्याने गढुळ व दुषीत पाणी पिल्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता.यामुळे संंतापलेल्या नागरिकांनी सदर ग्रीडची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली दि.१ ऑगस्ट रोज गुरुवारला पंचायत समिती समोर घागर फोड आंदोलनाचे आयोजन केले होते.पंचायत समिती समोर सुरू झालेले आंदोलन पुढे जाऊन गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर घागर फोडण्या पर्यंत गेले.सदर प्रकरणाबाबत अधिकाऱ्याशी चर्चा करताना नागरिकांचा रोष उफाळून आला व शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आक्रमक झाले.योजनेबद्दल समाधान कारक उत्तर न मिळाल्याने शिवसैनिकांचा ताबा सुटला व उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी यांचेवर गढुळ पाणी फेकले.आंदोलक एवढ्यावरच न थांबता त्यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात बैठा आंदोलन करून शासनाच्या फसव्या धोरणाचा जाहिर निषेध केला.गट विकास अधिकारी विवेक बेल्लालवार, ग्रामीण पाणीपुरवठाचे उप अभियंता विलास भंडारी यांचेशी चर्चा करण्यात आली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.यादरम्यान जिल्हा परिषदेचे ग्रामीण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विवेक जाॅन्सन व पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता बोहरे यांचेशी फोन द्वारे चर्चा करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांना समस्यांचे निवेदन दिले.या अनुषंगाने संबंधीत प्रकरणावर समिती गठीत करून ५ ऑगस्ट ला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार यांनी दिल्या नंतर आंदोलनकर्त्ये बाहेर निघाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे,वेळवा सरपंच जितेंद्र मानकर,घनोटी सरपंच पवन गेडाम, आष्टा सरपंच किरण डाखरे, थेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार यांची उपस्थिती होती.
🟪

आंदोलक पाणीप्रश्नावर आक्रमक झाले.आंदोलकांनी आधी गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर घागर फोडले नंतर ते गटविकास अधिकारी यांच्यावर गढुळ पाणी फेकले.प्रकरण हाता बाहेर जाणार असल्याचे लक्षात येताच गट विकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केले व याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
🟪

गट विकास अधिकारी बेल्लालवार यांच्यावर गढुळ पाणी फेकण्यात आल्याने बेल्लालवार यांनी संबंधितावर पोंभूर्णा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३२,२९६,१८९/२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर करीत आहेत.