मुल:- चंद्रपूर जिल्हा मुल तालुक्यातील चांदापूर हेटी येथील पुंजणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना काल दिनांक 26 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.
चांदापूर हेटी येथील शेतकरी महेंद्र निमकर, जयेंद्र निमकर, विजय देशमुख या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धानाची कापणी करून जयेंद्र निमकर यांच्या शेतात पुंजणे करून ठेवण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तींनी निमकर यांच्या शेतात ठेवलेले पुंजणे जाळले. प्रत्येकी पाऊन एकराचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असुन एकूण 80 हजार रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या तीनही शेतकऱ्यांनी मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मुल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तलाठी, कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.