Chandrapur News: चंद्रपूरमध्ये ठाणेदाराची मुजोरी?; जनप्रतिनिधीची कॉलर पकडून ३० मीटर ओढले!

Bhairav Diwase

'आप'चा पोलिसांवर गंभीर आरोप 

चंद्रपूर:- बाबूपेठ परिसरातील साईबाबा मंदिर ते जुनोना चौक हा परिसर अतिशय वरदळीचा असून या ठिकाणी दोन वर्षापूर्वी वडील व त्यांचा ७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतर आम आदमी पार्टी चे राजू कुडे तर्फे सातत्याने सदर ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात येत असली तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
काल दुपारी जुनोना चौकात पुन्हा एकदा अपघात होऊन एका युवकाचा थार चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात दोन ठोस मागण्या ठेवण्यात आल्या.



1. अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत जेणेकरून भविष्यातील अपघातांना आळा बसेल.

2. मृतकाच्या परिवाराला १० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी.



परंतु, आंदोलनादरम्यान रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद न साधता विषय समजवून न घेता दादागिरी करून 
आम आदमी पार्टी चे युवा जिल्हाध्यक्ष  राजू कुडे यांची शर्टची कॉलर पकडून ३० मीटरपर्यंत ओढत नेत धक्काबुक्की केली. जनतेसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांशी अशी वागणूक करणे ही गंभीर बाब असून यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन जनतेला सुरक्षा पूरविन्या करिता आहे की मुजोरी करण्याकरिता आहे असा जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.



आम आदमी पार्टी तर्फे या गैरवर्तणुकीविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यात आलेली असून संबंधित ठाणेदार आसिफ राजा शेख यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.


या मार्गावरून रोज शेकडो अवैध रेती चे जड वाहन चालत असतात परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेती तस्करावर पोलीस विभाग व महसूल विभाग यांच्या मेहरबानीमुळे रोज अपघात होणे नित्याचे झाले आहे. जर न्याय मिळाला नाही तर आम आदमी पार्टी आंदोलनाचा पवित्रा उचलेल असे आम आदमी पार्टी तर्फे प्रेस द्वारे कळविण्यात येत आहे.


पोलीस निरीक्षक शेख म्हणाले, आम्ही कायद्याच्या चौकटीत.....

या संदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक शेख म्हणाले, "आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून परिसरातील शांतता भंग होऊ नये याकरिता कायदेशीर मार्गांचा वापर केला आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागला. आम्ही तातडीने या प्रकरणाची दखल घेत, दोषी एसटी बस आणि थार चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी त्यांनी 'आप'चे राजू कुडे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांना पूर्णपणे खोटे ठरवले. ते म्हणाले, "राजू कुडे यांनी केलेले आरोप निराधार आहेत.