डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा.
Bhairav Diwase. June 06, 2020
चंद्रपूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यास बांबूपासून साहित्य तयार करणारा व्यवसायही अपवाद राहिला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये बांबूच्या काळीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरूड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
बुरुड व्यवसायिकांकडे साहित्य तयार असून विक्री होऊ शकत नाही. वाहतूक बंद असल्यामुळे बांबू आणू शकत नाही. डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा, या विवंचनेत असलेले बुरूड व्यावसायिक पूर्णत: हतबल झाले आहेत. शासनाने लक्ष पुरवावे व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे. कोरोना महामारीचे संकट सर्व जगभर आहे.
मागील दोन महिन्यांत अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांबूपासून टोपल्या, सुपे आदी वस्तू तयार करणारा बुरूड समाजही संकटात सापडला आहे. आजही मूळ व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे. बरेच समाजातील लोक हाच पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. या समाजातील अनेक लोक बांबू विक्रीचा देखील व्यवसाय करत असतात. गेल्या काही अनेक वर्षापासून बुरूड व्यवसाय टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कोरोनामुळे सध्या सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आता हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान या समाजासमोर आहे.
गांधी चौकात अनेक बुरुड समाजाचे नागरिक टोपले, सुप आदी साहित्य विक्री करण्यासाठी बसतात. लॉकडाऊनपूर्वी वस्तूची काही प्रमाणात खरेदी होत होती. मात्र आता आता ग्राहकांने खरेदीकडे पाठ फिरवली असल्याने आर्थिक अडचण येत असल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.