Bhairav Diwase. Aug 13, 2020
चंद्रपूर:- दहावीच्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून मूळ गुणपत्रिका मिळणार आहे. गुणपत्रिकांचे वाटप शाळांमधून करण्यात येणार असून शाळांनी विद्यार्थांना विशिष्ट तारखेलाच गुणपत्रिका घेण्यासाठी यावे, असा आग्रह धरू नये, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.
दहावीच्या ऑनलाईन निकाला वेळी विद्यार्थांना वेबसाईटवर गुण पाहण्याची आणि त्याची प्रिंट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना दहावीच्या मूळ गुणपत्रिका सोमवार १७ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागीय मंडळाकडून शाळांना १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत गुणपत्रिका वाटप करण्यात येणार आहे. शाळांमध्ये एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन गुणपत्रिका वाटपाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.