Bhairav Diwase. Nov 05, 2020
चंद्रपूर:- लाखो महिलांच्या विरोधा नंतर ही केंद्र पुरस्कृत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सरकारने खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात जिल्हयातील हजारो समुहां सोबत, महिला, कॅडर व कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 5 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील लाखो महिलांचा आधारस्तंब असलेल्या उमेद (Msrlm) अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरा पासून टप्या- टप्याने खच्चीकरण केले असून ग्रामीण महिलांना मिळणारा खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी हळू हळू देणे बंद करण्यात येत असून, त्यानंतर अभियानाचा पाया असलेल्या कॅडर महिला यांचे मानधन देण्यास अडचणी निर्माण करण्यात आल्या व त्यानंतर कर्मचारी यांच्या सेवा खासगी कंपनीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मागील 9 वर्षाच्या परिश्रमातून सुरु असलेले स्वयंसहायता समुह, ग्रामसंघ, प्रभागसंघ ,उपजीविका उपक्रम, या संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन,व महिला सक्षम करणारे हे अभियान निरंतर सुरु राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप नसावा या मागणीसाठी उमेद कर्मचारी व हजारो महिलांनी मुक मोर्चा सुदधा काढला. लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाला सदर अभियान पुर्वी प्रमाणेच सुरू राहावे, यासाठी पत्रे दिलीत. संसाधन व्यक्ती, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या द्वारे १० लाख पोस्ट कार्ड पाठविले गेले. पंरतू खासगी कंपनी सोबत हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सदर निर्णय घेतला आहे. या अभियानास पुढे नेणाऱ्या अनेक प्रशासकिय अधिकारी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांनी या निर्णयाचे ग्रामीण अर्थकारणावर पडणारे दूरगामी परिणाम समाजावून सांगितल्यानंतर ग्रामविकास विभाग निर्णय बदलण्यास तयार नाही. कर्मचारी यांच्या सेवा राज्यभरात वादग्रस्त ठरलेल्या संस्थेला देण्यापोटी १४ टक्के रक्कम अतिरिक्त दिली जाणार आहे. त्यामुळे हे सर्व निर्णय कुणासाठी होत आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे अभियानातील कर्मचारी यांनी उदयापासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जिल्हयातील सर्व महिला, कॅडर आणि उमेद निर्मित सर्व संस्था सहभागी होणार आहेत. दरम्यान, तालुका तसेच ग्राम स्तरावर कामबंद आंदोलनास पाठींबा म्हणून समुहांकडून वेगवेगळी आंदोलने केली जाणार आहे.
महिला समूह, ग्रामसंघ व प्रभाग संघ यांना दिला जाणारा निधी त्वरित वितरीत करावा. बाह्य संस्थेचा हस्तक्षेप नको. कॅडर चे मानधन त्वरीत वितरीत करावे. अभियानातील कर्मचारी यांचे सेवा अभियानाच्या मुळ मनुष्यबळ संसाधन धोरणेनुसार अविरत सुरु ठेवावी अशा उमेद(Msrlm) कर्मचारी,कॅडर, महिला यांनी मागण्या केल्या आहेत.
(बातमी संकलन:- विरेंद्र का. मेश्राम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी आधार न्यूज नेटवर्क)