महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर:- विजय वडेट्टीवार

Bhairav Diwase
परीक्षांबाबत केला मोठं विधान.
महाराष्ट्र:- राज्यात कोरोना विषाणू ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मोठ्या मोठ्या शहरात कडक निर्बंध घातल्या नंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्याच दरम्यान आता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे असं मोठं विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातली एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार' असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.



परीक्षांबाबत मोठं विधान.........

राज्य सरकारने परीक्षांचं वेळापत्रक आधीच जाहीर केलं आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परीक्षांबाबत नव्याने निर्णय घेण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाईन घेता येईल का? किंवा तामिळनाडूमध्ये सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. त्या धर्तीवर काही निर्णय घेता येईल का? याबाबतचाही विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.