Top News

बियाणे आणि खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना चोरटे बनवत आहेत लक्ष.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- शेतीची लगबग आता सुरु झाली आहे. अशातच बियाणे आणि खते खरेदी करिता आलेल्या शेतकऱ्यांना चोरटे आपले लक्ष बनवीत आहे. अशीच एक घटना यवतमाळ शहरात घडली आहे.
बियाणे खरेदी करण्यासाठी आपल्या पतीसह कृषी केंद्रात आलेल्या महिलेची तब्बल 49 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपासकेली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील अगदी वर्दळ असलेल्या दत्त चौक येथे घडली आहे. शकुंतला गिरडकर रा.किन्ही असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.
संबंधित महिला ही आपले पती महादेव गिरडकर यांच्यासोबत बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात आली होती. तत्पूर्वी तिने येथील दत्त चौकातील सेंट्रल बँकेतून 49 हजाराची रोकड बियाणे खरेदीसाठी काढली.
त्यानंतर दत्त चौकातील आणि पुष्पक कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी गेली. संबधित दुकानातून तिने चार पाकीट बियाणे खरेदी देखील केले. दरम्यान दुकानात होत असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी संबंधित महिलेच्या पिशवीतील कागदपत्रे व पैशे असलेल्या लहान पिशवीतून हातचलाखीने 49 हजाराची रोकड काढली तिथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. घटनेनंतर फिर्यादी शकुंतला गिरडकर यांच्या तक्रारीवरून अवधूत वाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने