Top News

गहू-तांदूळाचा काळाबाजार. #Pombhurna

भाग १

अवैध मार्गाने अनाज नेणाऱ्या ट्रकला सहा दिवसानंतर क्लीनचीट.

महसूल विभागाने केला फक्त कार्यवाहीचा फार्स.

नेत्यांचा दबाव की व्यापारावर मेहरबानी.
संग्रहित छायाचित्र
पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहर व परीसरातील अनेक गावात पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या जाणीव पुर्वक दुर्लक्षितपणामुळे तांदूळ व गहु माफियांचा धुमाकूळ सुरु असून रेशनिंगवर मिळणाऱ्या गहू व तांदूळाचा काळाबाजार तेजीत सुरू आहे. गोडावून मध्ये अवैध साठा करुन ठेवलेले व खोटे बनावट पावत्या तयार करून गहू-तांदूळाचे पोते ट्रकमध्ये मध्ये भरुन इतर राज्यात पाठविले जात आहेत.मात्र गहू व तांदूळाचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात प्रशासन कसल्याच प्रकारची कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्मार्ट सिटीचे कात टाकत असलेल्या पोंभूर्णा शहर व परीसरात गेल्या काही महिन्या पासुन गहू माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध मार्गाने काळाबाजार करणाऱ्या तांदूळ व गहू माफियाना कायद्याचा धाक नसल्याने ते इतके माजले आहेत की चक्क रस्त्यावर वाहने लावून साठा करुन ठेवलेले रेशनिंगचे गहू- तांदूळाचे पोते बदलवण्याचे धाडस करीत आहेत.
शासनाने रेशनिंग मध्ये होणाऱ्या काळाबाजार संपविण्यासाठी बायोमेट्रिक मशीन रेशनिंग दुकानदाराला दिली.मात्र गहू-तांदूळाचा काळाबाजार करण्यात पटाईत असलेले व्यापारी रेशनिंग दुकानदार व रेशनकार्ड धारकाकडुनच गहू- तांदूळ खरेदीचा व्यवसाय सुरु करून जमा झालेल्या गहू- तांदूळाची विल्हेवाट लावून मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे.
हा सर्व प्रकार तहसील कार्यालयातील पुरवठा खात्याला माहिती असतांनाही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहेत.यामध्ये काही चिरीमिरीचा प्रकार होत तर नसेल ना याची शंका येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यासर्व काळया धंद्यात लोकलछाप कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून राजकीय क्षेत्रातील नेते विनाकारण माफीयांचा साथ देत असल्याचे चित्र पोंभूर्ण्यात दिसत आहे. मागील काही दिवसापुर्वी गहू-तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्या बारा चक्का ट्रकवर गुप्त माहितीच्या आधारावर छापा मारण्यात आला. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करु नये यासाठी लोकलछाप कार्यकर्त्यांनी नेत्यांचे नाव पुढे करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून कार्यवाही रोकल्याची चर्चा सुरू आहे. घटनेतील ट्रक ताब्यात घेऊन कार्यवाही व तपासाच्या नावावर सहा दिवस शासकीय गोडावूनला लावण्यात आला होता. मात्र सहा दिवसानंतर एकाएकी रात्रो कोणतीही कार्यवाही न करता क्लीन चिट देत सोडून देण्यात आले. सहा दिवस ट्रकमधील माल बदलविण्याकरीता व बनावट पावत्या तयार करण्यासाठी वेळ मिळाल्याने व खात्यातील काही मंडळी माफीयांना साथ देत असल्याने हा प्रकार दाबण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी रेशनिंगचा अन्नधान्य वितरीत करण्यात येतो. मात्र अन्नधान्याचा काळाबाजार करणारे माफीया मात्र इमले उभे करण्यासाठी गरिबांच्या पोटालाच बुक्कीचा मार देत आहेत.आणि अन्नाचा काळाबाजार करणाऱ्या माफीयांना नेते,अधिकारी मुक संमती देत आहेत. २९ सप्टेंबरला पोंभूर्णा तालुक्यातील जामतुकूम येथे चाललेला अन्न पुरवठा विभागातील सहा दिवसाचा हायव्होलटेज ड्रामा अनेक प्रश्न उपस्थित करून सोडणारा आहे. गहू- तांदूळाच्या काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग व पोलिस प्रशासनाने धडक मोहीम उघडून कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने