Top News

कोरोना काळात बंद केलेला रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करा #chandrapur #bhadrawati

अमित गुंडावार यांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना काळात बंद करण्यात आलेला भांदक रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार यांनी एका निवेदनाद्वारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे नुकतीच केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भांदक रेल्वे स्थानक येथे इंग्मोर एक्सप्रेस , दक्षिण एक्सप्रेस , तेलंगना एक्सप्रेस , जयंती एक्सप्रेस , दादर लिंक एक्सप्रेस , पटना एक्सप्रेस इत्यादी गाडयांचा थांबा कोरोना पूर्व काळात दिलेला होता. कोविड 19 महामारी मुळे देशात लॉकडाऊन लागल्याने रेल्वे पुर्णतः बंद झाली होती. परंतु हळूहळू रेल्वे पुर्ववत सुरू करण्यात आली आणि इतर गावातील थांबे सुध्दा पुर्ववत सुरू करण्यात आले. परंतु भांदक रेल्वे स्टेशनला असलेला थांबा सुरू करण्यात आलेला नाही.
पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांचे थांबे भांदक रेल्वे स्थानकास पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे. कारण भांदक हे औद्योगीक वसाहतीचे क्षेत्र आहे. येथे आयुध निर्माणी चांदा , वेस्टर्न कोल फिल्ड , भांदक सिरॅमिक , एन.टी.पी.सी. एम्टा कोल माईन्स लिमि. इत्यादी मोठ्या औद्योगीक क्षेत्राची वसाहत असुन भद्रावती हे तिर्थ क्षेत्र सुध्दा आहे. हिंदू, बौध्द व जैन धर्मीयांचे तिर्थक्षेत्र भांदक येथे आहे. विश्वप्रसिध्द बौध्दलेणी सुध्दा भांदक येथेच आहे. त्यामुळे पर्यटक भांदक येथे भरपुर प्रमाणात रेल्वेनी ये-जा करतात.
औद्योगीक शहर असल्याने देशातील प्रत्येक राज्यातील लोकांचे आवागमन भांदक रेल्वे स्थानकावरून होत असते. भांदक शहरापासुन २० कि.मी. अंतरावर वरोरा शहर असून त्या ठिकाणी नविन गाड्यांचे थांबे देण्यात आलेले आहे. परंतु सदर सर्व गाडयांचे थांबे भद्रावती औद्योगीक शहर असल्याने भदावती येथे थांबा देणे गरजेचे होते. पण तसे न होता सुरू असलेल्या गाड्यांचे सुध्दा थांबे बंद करण्यात आले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोरोना काळात बंद झालेल्या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू झाल्यास कित्येकांना रेल्वेचा लाभ घेता येईल , शैक्षणिक व नौकरी निमित्ताने रेल्वेने जाणे- येणे करणाऱ्यांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनवर आधारीत व्यापार सुध्दा पूर्णतः ठप्प झालेला असून रेल्वेस्थानक परिसरातील व्यापा-यांवर सुध्दा उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे लोकहितार्थ कोरोना पूर्व काळात सुरू असलेल्या प्रत्येक गाडीचा थांबा पुर्ववत सुरू करून आम जनतेस दिलासा द्यावा तसेच नवजीवन एक्सप्रेस, हिसार एक्सप्रेस, ग्रॅण्ड ट्रक एक्सप्रेस चा सुध्दा थांबा भांदक रेल्वे स्थानकास देण्यात यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना अमित गुंडावार, श्रीपाद बाकरे, प्रकाश मेंढे, श्रीनिवास घोसे, बबलू पठाण, वैभव टाले उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने