चंद्रपूर:- शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ वेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला आहे.
अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे सध्या प्रयत्न होत आहेत. शिंदे गटाने मागितलेल्या प्रस्तावावर आ. किशोर जोरगेवार त्यांचे निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. राज्यातील अन्य अपक्ष आमदारांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.