पोंभूर्णा:- अनेक वर्षांपासून असलेल्या शेतीच्या वादाचा तोडगा काढण्यासाठी गावात झालेली बैठक आटोपून टुव्हिलरने जात असताना अचानक गाडीवरून उतरून धाव घेत गावानजीक असलेल्या विहिरीत शेतकऱ्यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोंभूर्णा तालूक्यातील आष्टा येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव अरुण मारोती बोढेकार वय ४७ वर्षे असुन तो आष्टा येथील रहिवासी आहे.
आष्टा येथील शेतकरी अरूण बोढेकार हा मागील २५ वर्षांपासून बाजूची शेती कसत होता. मात्र त्या शेतीच्या संबंधाने वाद सुरू होता. याबाबत अनेक वेळा बैठका झाल्या मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. घटनेच्या दिवशी २७ तारखेला गावात शेतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. मात्र निराश झालेल्या अरूण बोढेकार यांनी टुव्हिलरने जात असताना गाडीतून अचानक खाली उतरला व गावा नजीक असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी मुलगा भुषण व तंटामुक्त समिती अध्यक्षाने विहिरीत उडी घेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवू शकले नाही.
मृतकाला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृतक अरुण मारोती बोढेकार याच्या खिशात चिट्ठी मिळाली. यामध्ये काहि लोकांच्या दडपण्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले असल्याने पोलिसांनी ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार करीत आहे.