चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या बैलांना वाचवतानाचा थरार... #VIDEO #chandrapur

Bhairav Diwase
1 minute read

बैलांचा जीव वाचविण्यासाठी माणसांची धडपड

चंद्रपूर:- विदर्भात पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढ्यांचे पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून एकाठिकाणी चक्क बैलगाडीच पाण्यात वाहून गेल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला पूर आला असून गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरुन वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. त्यामुळे, ग्रामस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर, गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र, यामार्गे असलेला बारमाही नाला विकासात अडसर ठरलाय.

शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलगाडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना प्रचंड प्रवाहामुळे बैलांसह बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. मात्र, मोठी कसरत करुन पाण्यात उतरून गावकऱ्यांनी हे जीव वाचवले आहेत. गहिनीनाथ वराटे असे या दुर्घटनेत वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.