Top News

व्हॅनचा दरवाजा उघडला अन् मागून येणाऱ्या बसने चिरडले #Nagpur #chandrapur #accident



नागपूर:- शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे नागपुरातील एका महिलेचा पुन्हा बळी गेला आहे. रस्त्यावरून जाताना पिकअप व्हॅनचा दरवाजा एका महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यासाठी मृत्यूचे कारण बनला. पिकअप व्हॅनचालकाने अचानक दरवाजा उघडला व त्याच्या निष्काळजीपणामुळे मागून दुचाकीवरून येणारी महिला दरवाजाला धडकली. त्यानंतर खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून एसटी बसचे चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्दैवी अक्षरश: हादरले होते. अपघातामुळे घटनास्थळावरील लोक शीतल विकास यादव (वय 42, द्वारका अपार्टमेंट, खामला) असे मृत महिलेचे नाव आहे.

एकीकडे शहरात वाहनांची संख्या वाढली असताना दुसरीकडे वाहन चालकांमध्ये रस्त्यावर वाहन चालविण्याची शिस्त दिसून येत नाही. त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. प्राप्त माहितीनुसार मृत महिला काँग्रेसनगरकडून धंतोली पोलिस (Nagpur Police) ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरून जात होत्या. त्या काम करत असलेले महानगरपालिका कार्यालय काही मिनिटांच्या अंतरावर होते. मात्र त्या रस्त्याने जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच-31-D - 0698 या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनचा चालक अमित निभोरकर (वय 30) हा खाली उतरायला गेला आणि त्याने मागे न पाहता निष्काळजीपणे दरवाजा उघडला.

अचानक उभ्या असलेल्या वाहनाचा दरवाजा उघडणार असल्याचा अंदाज नसल्याने मागून येणाऱ्या शीतल त्या दरवाजाला धडकल्या व रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी एसटी महामंडळाची बस मागून येत होती. त्या पडल्यावर लगेच त्या बसखाली आल्या व त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने सर्वच जण हादरले. तातडीने याची सूचना धंतोली पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

सिटीबसमधूनही रस्त्याच्या मध्येच उतरवले जातात नागरिक

नागपूर महानगरपालिकेद्वारा (NMC) संचालित 'आपली बस'या सिटीबस चालकांद्वारेही सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागीच प्रवासी उतरविण्यात येतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या अपघाताची सतत शक्यता असते. मात्र यासंदर्भात कारवाई करण्याची किंवा चालकाला समज देण्याची तसदीही प्रत्येक चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत नसल्याने आणखी अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


बेशिस्त वाहन चालकांमुळे वाढले अपघात

कार किंवा पिकअप व्हॅनचा दरवाजा उघडताना आरशात मागून कुठले वाहन येत आहे का, याची चाचपणी करणे अनिवार्य असते. मात्र अनेक जण निष्काळजीपणा दाखवतात. रस्त्यावरच अनेकजण दरवाजा उघडताना दिसतात. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर यामुळे अपघात होताना दिसून येतात. मात्र तरीदेखील लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. अशाच निष्काळजीपणामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्याचा नाहक जीव गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने