Top News

वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी सुनेनंच पाजलं घरातल्या पाच जणांना विष #chandrapur #gadchiroli


जिल्ह्यातील हत्येचं रहस्य उलगडलं

गडचिरोली:- महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे (Gadchiroli Murder) रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आलं आहे. या पाच लोकांची नैसर्गिक मृत्यू नसून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. हत्यारे दुसरे तिसरे कुणी नसून सून आणि मेहुण्याची पत्नी आहेत. वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील काही दिवसापासून अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पिरु कूभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या वीस दिवसांचे कालावधीत अचानक आजारी पडून मृत्यू झाल्याने त्या परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू

सर्व प्रथम दिनांक 20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी आणि त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. परंतु दिनांक 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व दिनांक 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यू झाला.

त्या धक्क्यातून सावरत असताना अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यू झाला.

आई वडील उपचारकामी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडीलांच्या मृत्यूनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारकामी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

त्याचप्रमाणे शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथून चंद्रपूर येथे उपचारकामी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुसऱ्या दिवशीपासून प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या सालीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला उपचार कामी रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी कळविले आहे.

मृत्यू पावलेल्या पाच व्यक्ती व सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींनमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये व डोक्यामध्ये प्रचंड वेदना व ओठ काळे पडून जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसून आली. सदर लक्षणावरुन मृत व आजारी व्यक्तींना कुठलीतरी विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकिय अधिकारी यांनी वर्तवला. परंतु त्यांच्या करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये ते विषाबाबत अधिक निश्चित माहिती निष्पन्न झाली नाही.

एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी एसडीपीओ अहेरी सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपणीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्रात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असताना, परिसरातील गोपनीय सुत्रांकडून गावात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे व साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली.

त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्याशी तिच्या आई वडिलांच्या विरोधात जावून लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पती रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत. तसेच सहआरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करत असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे परिवार आणि त्यांचे नातलागांना विष देऊन जिवे ठार मारण्याची योजना आखली.

त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावून विष आणले आणि ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवून त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता. परंतु तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवून तो आजारी पडला.

घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अहेरी येथे अप क्र. 374/2023 कलम 302, 307, 328, 120 (ब) व 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड हे करत असून सदर गुन्ह्रातील दोन्ही महिला आरोपी यांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्यात इतर आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने