उमेदवारांना मोठा दिलासा
मुंबई:- राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Shikshak Bharti) पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबवली जात असताना लोकसभा आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेवर निर्बंध आले होते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Also Read:- चंद्रपुरात वाढतोय उष्माघाताचा धोका
पवित्र पोर्टल मार्फत 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्व साधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 निवडणुकीचा (Shikshak Bharti) कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.
याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे; असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास 19 एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे.त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत; असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.